ठाणे महापालिकेच्या पर्यावरणाशी निगडित उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन
- गावदेवी मैदानात आयोजित शून्य कचरा व पर्यावरण प्रदर्शनाला दिली भेट
- शनिवार-रविवारी प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले
- प्रदर्शन, कार्यशाळा, स्पर्धा आणि परिसंवाद यांची नागरिकांसाठी अनोखी पर्वणी
ठाणे (06) : ठाणे शहर हे स्वच्छ, सुंदर आहे. या शहराचे विद्रुपीकरण होऊ नये म्हणून ठाणे महानगरपालिका प्रयत्न करतेच आहे. परंतु, ही संपूर्ण जबाबदारी ठाणे महापालिकेवर न टाकता नागरिकांनीही ठाणे स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिका आयोजित शून्य कचरा आणि पर्यावरण भव्य प्रदर्शनाला भेट दिल्यावर केले.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, ठाणे महापालिकेतर्फे नौपाडा येथील गावदेवी मैदानात ‘उत्सव वसुंधरेचा, संकल्प हरित ठाण्याचा’ या उपक्रमात शून्य कचरा व पर्यावरण या विषयावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी सायंकाळी या प्रदर्शनास, आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी भेट दिली. त्याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त मधुकर बोडके, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह सर्व मान्यवर आणि नागरिकांनी ‘माझी वसुंधरा शपथ’ घेतली. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन हा स्तुत्य उपक्रम असून त्यास जास्तीत जास्त नागरिकांना भेट द्यावी, असेही आमदार संजय केळकर म्हणाले.
याप्रसंगी, महापालिकेसाठी प्रत्येक दिवस पर्यावरण दिन असतो. पर्यावरणाचे क्षेत्र जितके उत्तम तितके ते शहर उत्तम असते. पर्यावरणपूरक विविध प्रकल्प ठाणे महापालिका राबवित असून या उपक्रमात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. हा सहभाग वाढावा आणि नागरिकांना पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती मिळावी यासाठी या ‘उत्सव वसुंधरेचा, संकल्प हरित ठाण्याचा’ अंतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.
उष्णता कृती आराखडा राबविणारी ठाणे ही देशातील पहिली महानगरपालिका असल्याचेही आयुक्त राव यांनी सांगितले. तसेच, हवेची गुणवत्ता चांगली कशी राखली यासाठीही महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन १४०० टन कचरा गोळा केला जातो. यासाठी डायघर येथे बायोगॅस प्रकल्प प्रतिदिन ३५० टन या क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिका मूर्तीकारांना शाडूची माती व जागा उपलब्ध करून देत असून ‘माझे घर माझा बाप्पा’ हे अभियान महापालिका राबविणार आहे. त्यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही आयुक्त राव यांनी केले.
‘शून्य कचरा आणि पर्यावरण प्रदर्शन २०२५’ अशी या उत्सवाची संकल्पना आहे. त्यातील, पर्यावरण संवर्धन भव्य प्रदर्शनात पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकला पर्यायी वस्तू, सौर ऊर्जा, मलनि:सारण प्रकल्प, हवा सर्वेक्षण उपकरणे यांच्याशी निगडित दालने असून आयुक्त सौरभ राव यांनी सर्व दालनांना भेट देवून त्यांची माहिती व उपयुक्तता जाणून घेतली.

गृहसंकुलांचा गौरव
कचऱ्याचे नियमित व्यवस्थापन करणऱ्या व वर्षभरातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या नऊ प्रभाग समितीतील गृहसंकुलांचा यावेळी गौरव करण्यात आला. रविउदय सोसायटी (नौपाडा प्रभाग समिती), विराट को. हौ. सोसायटी (कळवा प्रभाग समिती), कल्पतरू सनराईज को. ऑ. हौ. सोसायटी (माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती), रूस्तमजी आजियानो एबीसी को. ऑ. हौ.सो (उथळसर प्रभाग समिती), दोस्ती विहार को. ऑ. हौ. (लोकमान्य नगर- सावरकर नगर प्रभाग समिती), ग्रेस स्क्वेअर को. ऑ. हौ. सो. (मुंबा प्रभाग समिती), रुणवाल मायसिटी टॉवर (दिवा प्रभाग समिती), रहेजा को. ऑ. हौ. सो. (वागळे इस्टेट), अशर मेट्रो टॉवर (वर्तक नगर प्रभाग समिती) या गृहसंकुलांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या जिंगलचे व घनकचरा विभाग यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या स्वच्छता गीताचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी केले. हे प्रदर्शन ०८ जून पर्यंत स. १० ते रा. १० पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. तसेच, या उत्सवातील सर्व कार्यशाळा, परिसंवादही सगळ्यांसाठी विनामूल्य खुले आहेत. त्याबाबत अधिक माहिती प्रदर्शनस्थळी मिळेल. कार्यशाळा आणि परिसंवाद हे उपक्रम दुपारी तीननंतर सुरू होतील, अशी माहिती प्रधान यांनी दिली.
दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी ऋषिकेश पानकर यांच्या मार्गदर्शनात ‘कचऱ्यातून कला’ आणि आदित्य हिंदलकर यांच्या मार्गदर्शनात ‘शाडू मातीपासून मूर्ती घडविणे’ या दोन कार्यशाळा झाल्या. तसेच, ‘पर्यावरणपूरक जीवनशैली’ या परिसंवादात लता मेनन (शाडू मातीचा पुनर्वापर), रोहित जोशी (पर्यावरणपूरक गणेशोत्सव), दिलीप काकवीपुरे (जैवविविधता आणि आपण), अपर्णा कुलकर्णी (पर्यावरण शाश्वततेचे भारतीय प्रारुप), प्राचिन्मय (शाश्वत पर्यावरण आणि शाश्वत सेवा) हे तज्ज्ञ सहभागी झाले.
शनिवारी कार्यशाळा, परिसंवाद
शनिवार, ०७ जून रोजी ‘कबाड बॅण्ड’ ही श्रीपाद भालेराव यांच्या मार्गदर्शनात, पौर्णिमा शिरगावकर यांच्या मार्गदर्शनात ‘कुंडीत रोपे लावणे’, तसेच, ‘कागदी पिशव्या बनवणे’ ही प्रिया कणसे यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळा होईल. त्याचबरोबर, ‘घरगुती कचरा व्यवस्थापन’ या परिसंवादात सुरभी ठोसर (आपल्या कचऱ्याचे आपण व्यवस्थापक), निलीमा मोहिते (पर्यावरणपूरक घरगुती स्वच्छता संसाधने), लता घनश्यामानी (सॅनिटरी वेस्ट व्यवस्थापन) हे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. त्याच दिवशी, ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा मनोरंजनपर कार्यक्रमही होईल.
रविवारी कार्यशाळा आणि सांगता
रविवार, ०८ जून रोजी या उत्सवाची सांगता होईल. त्या दिवशी, ‘शाश्वत पर्यावरण’ या विषयावर परिसंवाद होणार असून त्यात, संदीप अध्यापक (शाश्वत इमारत व्यवस्थापन), प्रदीप घैसास (निसर्गावर आधारित पर्याय), शरद पुस्तके (ऊर्जा व्यवस्थापन) हे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. तसेच, सुरेश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नैसर्गिक रंग प्रशिक्षण’ कार्यशाळा होईल. समारोप, सर्व स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाने होणार आहे.