
ठाणे – भारतीय सैन्याने पाकिस्तानाला धडा शिकवला आणि काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय नागरिकांचे रक्षण करणारे आपले जवान यांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बुधवारी ठाणे शहरात भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ एक भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.
या रॅलीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे स्वतः सहभागी झाले होते. त्यांच्या सोबतच मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, मा. आमदार रवींद्र फाटक, राम रेपाळे, हेमंत पवार, द्वारकानाथ भोईर, मनोज शिंदे, एकनाथ भोईर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते.
या रॅलीदरम्यान `वंदे मातरम’, `भारत माता की जय’ अशा देशभक्तीपूर्ण घोषणा देण्यात आल्या. यावेळी सर्वांच्याच चेहऱ्यावर देशासाठी अभिमान आणि सैन्याच्या प्रति आदराची भावना झळकत होती. तिरंगा हातात घेऊन नागरिक उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जवळजवळ साडेतीन तास ही रॅली ठाण्याच्या विविध भागांतून मार्गक्रमण करत होती.
शासकीय विश्रामगृहासमोरून रॅलीची सुरुवात झाली आणि ठाणे महानगरपालिका, गोखले रोड, वागळे इस्टेट, इंदिरानगर आणि पाचपाखाडी या मार्गांवरून तिरंगा फडफडत, जनतेचा उत्साह वाढवत ही रॅली पुढे सरकली आणि रॅलीचा समारोप ठाणे महानगरपालिका भवनासमोर झाला.
