
ठाणे जिल्ह्यातील मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहिमेबाबत सनियंत्रण समितीची बैठक मा. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27 प्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथील नियोजन भवनात पार पडली.
यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आपल्या मुलीचे आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. 14 ते 15वर्षे वयोगटातील मुलींना भविष्यातील गंभीर आजारांपासून, विशेषतः गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी ‘एचपीव्ही’ लस हे प्रभावी सुरक्षा कवच आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध असून पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, डॉ. बालाजी किणीकर, शांताराम मोरे, राजेश मोरे, पालक सचिव नवीन सोना, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
भारतामध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून तो गंभीर स्वरूपाचा आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात १४ वर्षे पूर्ण झालेल्या व १५ वर्षे पूर्ण न झालेल्या सर्व मुलींना ही लस विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात ३० हजार महिलाचे लसीकरण करण्यात आले असून कोणत्याही महिलेस लसीकरणाचे दुष्परिणाम झाले नाहीत.
सन २०२४ च्या ICMR-NCRP अहवालानुसार, भारतात दरवर्षी सुमारे ७८,४१९ नवीन रुग्ण आढळतात, तर ४२,३९२ महिलांचा या आजारामुळे मृत्यू होतो. ‘एचपीव्ही’ लसीकरणामुळे या विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण मिळून कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
गैरसमज दूर करण्याचे आवाहन
आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. ही लस पूर्णपणे सुरक्षित व वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आहे. २००६ पासून जगभरात ५० कोटींहून अधिक महिलांनी ही लस घेतली असून तिची प्रभावीता सिद्ध झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, या लसीचा प्रजननक्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. तसेच भारतात दिली जाणारी ‘क्वाड्रीव्हॅलंट एचपीव्ही’ लस एकच डोस देऊन प्रभावी संरक्षण देते. मुलगी मासिक पाळीत असली तरीही ही लस सुरक्षितपणे दिली जाऊ शकते.
जिल्हा आरोग्य विभागामार्फत शाळा व आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जात असून, प्रत्येक पात्र मुलीपर्यंत ही लस पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पालक, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र मुलींनी या मोहिमेचा लाभ घ्यावा व निरोगी भविष्यासाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.