पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वक्तव्याचा खासदार डॉ. शिंदेंकडून समाचार, डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वातील भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ मायदेशी परतले
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात देशातील सर्वच नेत्यांनी एकजूट दाखवायला हवी. जगाला भारत एक आहे हे दाखवले पाहिजे, मात्र त्याऐवजी विरोधक राजकारण करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेलं विधान हे राजकारणात खूपच अपरिपक्व असल्याची कबुली देते, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधींवर केली. आफ्रिकेतील चार देशांचा दौरा करुन मायदेशी परतल्यानंतर खासदार डॉ. शिंदे यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ११ वर्षात जगभरात भारताची प्रतिमा उंचावली आहे. भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळांनी ३२ ते ३४ देशांचा दौरा केला. या देशांनी भारताला चांगला प्रतिसाद मिळाला. भारताबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आदर दिसून आला. कारण त्यांच्या अडचणीच्या काळात भारत त्यांच्या बाजूनं उभा राहिला होता, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. मात्र विरोधकांना या गोष्टीत राजकारण करायचे आहे. राहुल गांधी यांना राजकारणात अजून समज यायची आहे, ते खूपच अपरिपक्व नेते असल्याने अशा प्रकारची बेताल वक्तव्ये करतात, अशी खरमरीत टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. काँग्रेस सरकारच्या काळात भारतात इतके दहशतवादी हल्ले का झाले, त्याचे राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे, असे आव्हान खासदार डॉ. शिंदे यांनी दिले.
खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल खासदार डॉ. शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. खासदार डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने यूएई, काँगो प्रजासत्ताक गणराज्य, सिएरा लिओन आणि लायबेरिया प्रजासत्ताक या देशांचा दौरा केला. यातील यूएई आणि सिएऱा लिओन हे दोन देश ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनचे सदस्य आहेत. काँगो प्रजासत्ताक आणि लायबेरिया प्रजासत्ताक हे दोन देशांना पुढच्या वर्षी संयुक्त राष्ट्रांचे अस्थायी सदसत्व मिळणार आहे. १४ दिवसांच्या दौऱ्यात तेथील राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संसदेचे सभापती, परराष्ट्र मंत्री, बुद्धीजीवी वर्गाशी चर्चा केली तसेच भारतीय समुदायाशी संवाद साधला असे डॉ. शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानकडून दहशतवादाला दिले जाणारे प्रोत्साहन , त्यांना दिली जाणारी ट्रेनिंग आणि दहशतवादी हल्ले, ऑपरेशन सिंदूर याविषयी प्रत्येक देशात जाऊन सविस्तर सांगण्याची संधी मिळाली. पाकिस्तानच दहशतवाद्यांना पोसतो, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. लष्कर ए तय्यबा, जैश ए मोहम्मद, टीआरएफ, हिजबुल मुज्जाहिद्दीन या दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये आश्रयाला आहेत. दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानचे लष्करी अधिकारी उपस्थित राहतात. त्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड झाला. या दौऱ्यात प्रत्येक देश भारतासोबत उभा राहिला. त्यांनी या हल्ल्याची कठोर शब्दांत निंदा केली. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगामध्ये घडलेल्या हल्ल्याबाबत लायबेरिया आणि सिएरा लिओन या दोन देशांनी संसदेत मौन बाळगून आदरांजली वाहण्यात आली, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.